रविवार, १९ जुलै, २०१५

पाली चा बल्लाळेश्वर गणपती दर्शन, आणि "किल्ले सरसगड", "उंबरखिंड रणसंग्राम"मोहिम २०१५

जेवढा या खिंडीचा इतिहास संघर्षपूर्ण तेवढंच नयनरम्य त्याचं दर्शन!!


पुणे-रायगड जिल्हयांच्या सीमेवर आणि सहयाद्रीच्या कुशीत दडलेली संघर्षपूर्ण आणि शिवाजी महाराजांच्या चतुरस्र रणनीतीची साक्षीदार असलेली उंबरखिंड ही आधुनिक मावळ्यांसाठी पर्वणीच ठरते. या उंबरखिंडीची इतिहासात एक आगळीवेगळी ओळख आहे. ती म्हणजे महाराजांनी मुघल सरदार कारतलब खान याच्या प्रचंड फौजेचा थोडया मावळयांच्या मदतीने केलेला दारुण पराभव. तो दिवस होता, दोन फेब्रुवारी १६६१. खानाच्या या पराभवामागे महाराजांना दूरदृष्टी होतीच; पण याहीपेक्षा उंबरखिंडीच्या भौगोलिक रचनेचा खुबीने करून घेतलेला वापर हे कारण मोठं होतं. खिंडीत घडलेला हा देदीप्यमान विजय याचि देही याचि डोळा पाहायला मात्र एक दिवस तरी राखून ठेवायलाच हवा. त्यासाठी पावलं या समरभूमीकडे वळवावीच लागतात.
१९ जुलै २०१५ रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी आम्ही सर्व जण मुंबई वरून निघालो. एक एक शिलेदार त्यांच्या सोयीच्या ठिकाणी येऊन थांबला होता , रबाले, खारघर आधी ठिकाणावरून सर्व जण एकत्र मिळाले आणि खार घर ला आमच्या दोन्ही वाहनाची पूजा आणि नारळ फोडून मोहिमेचा श्री गणेशा केला .  उंबरखिंड मोहिमेआधी आम्ही पनवेल , खोपोली मार्गे सर्वप्रथम पाली येथे दाखल झालो . बल्लाळेश्वराचं  मन प्रसन्न करणारे दर्शन झाल्यानंतर शेजारीच असणारा “किल्ले सरसगड ” आम्हांला खुणावत होता .. देवळाच्या मागच्या बाजूला मोठा डोंगर दिसतो. तोच सरसगड किल्ला
आहे. आवश्यक न्याहारी आणि खरेदी करून आम्ही “किल्ले सरसगड” सर करण्यासाठी नेहमी प्रमाणे शिस्तबधतेने निघालो. मंदिराशेजारील चौकात “प्रेरणा मंत्र” घेतले , आणि रांगेने आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहचलो .मंदिरापासून किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जायला साधारण तासभर लागतो. तिथे किल्ल्याची तटबंदी आहे. पायऱ्या उंच आणि अरुंद आहेत. या ६०-७० पायऱ्या दिंडी दरवाज्यात घेऊन जातात. आल्यावर या भागात तिहेरी तटबंदी बघायला मिळते. तिथून आपण किल्ल्याच्या पठारावर येतो. किल्ल्याच्या पठारावर बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. त्यानं किल्ल्याचा बराचसा भाग व्यापला आहे. हा डोंगर चढला की बालेकिल्ल्यावर पोहचता येतं. बालेकिल्ल्याच्या डोंगराच्या पोटात पाण्याच्या टाक्या, गुहा केलेल्या आहेत. डोंगर चढायला तसा सोपा आहे. पायऱ्याही आहेत. बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचं मंदिर, छोटा तलाव आणि दोन बुरुज आहेत. किल्ल्यावरून सुधागड, कोरीगड, धनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात. खालचं पाली गाव, अम्बा नदी असा परिसर न्याहाळता येतो. सरसगडच्या बाजूला तीन कावडीचा डोंगर आहे. 
.. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे. तासा-दीड तासात पूर्ण किल्ला बघून होतो. त्यामुळे पाली गावातनं निघून, किल्ला बघून पुन्हा चारेक तासांत पुन्हा पाली गावात येता येतं. किल्ले सरसगडाची आठवण मनात कोरून गाडीने आम्ही उंबरखिंडीच्या रणसंग्रामाच्या दर्शनासाठी निघालो . गर्द झाडीत आपल्या भिरभिरत्या नजरेला विजयस्तंभाचं दर्शन होतं. मन कृतार्थ होतं. विजयस्तंभाची रचनाच मुळी मोहक. स्तंभाच्या एका बाजूला इथल्या लढाईचं वर्णन, दुस-या बाजूला महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप, त्याच्याच खाली सिंह-हत्तीच्या लढाईचं सूचक चित्र, वर ढाल तलवारी यांच्या प्रतिकृती.. आणि या सर्वाचं खडकावरच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब.. हे सारं काही डोळयात साठवावं असंच. या स्तंभाशी गतकाळातल्या स्मृतींचं चिंतन करावं.. त्याच्याच नजरेतून त्या वेळच्या लढाईचा प्रसंग पाहावा.
 मराठी मावळ्यांच्या विजयाचं या खिंडीशी नातं सांगणारं.. त्यापेक्षाही शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ युद्धतंत्राची झलक दाखवणारं.. इतिहासाचं भावविश्व उलगडून मंत्रमुग्ध करणारं.. अशा या विजयस्तंभाला त्रिवार मुजरा करूनच आम्ही काही वेळ नदीच्या पाण्यात यथेच्छ पोहण्याचा आनंद लुटला , सोबत एकमेकान  सोबत चे छायाचित्रे हि काढली गेली , नंतर वेळ झाली ती संध्याकाळच्या जेवणाची !
जेवण बनवण्यासाठी आम्ही योग्य जागा शोधात होतोच , त्याच वेळी तिथे उभ्या असणाऱ्या गावकर्यांनी काही अंतरावर असलेल्या एका बंद घराची माहिती दिली आणि त्या ठिकाणी मोकळ्या अंगणामध्ये जेवण बनवता येईल आणि पाण्याची हि सोय असल्याची माहिती दिली . सूर्याची किरणे मावळतीला झुकत  चालली होती , आणि आमच्या सर्वांच्या पोटात भुकेने आगडोंब उसळला होता . जेवणाचे सर्व समान आन्ही आधीच बरोबर घेतले होते . गाडीने आम्ही सर्व त्या ठिकाणी दाखल  झालो . या वेळी “वेज पुलाव “ करण्याचा बेत होता . सर्वांनी जेवण बनवण्यासाठी खूपच मेहनत घेतली , अचानक पुन्हा सुरु झालेल्या पावसाने पेटवलेली चूल पुन्हा पुन्हा विझत होती . चुलीच्या वरती जवळच पडलेल्या सिमेंट पत्र्याचा छत म्हणून उपयोग केला , भर पावसात आम्ही चूल पेटवण्यात यशस्वी झालो . भात शिजवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागला , परंतु त्यात हि एक वेगळी मज्जा आम्ही सर्व अनुभवत होतो . शेवटी “दम बिर्याणी ” बनवण्यात आम्ही यशस्वी ठरलोच . त्या बंद घराची दरवाजे आम्ही उघडली आणि आत मधे गोल पंगत बसली आणि यथेच्छ जेवणावर ताव मारण्यात आला . पुन्हा तो संपूर्ण परिसर आहे तसा स्वच्छ ठेऊन आम्ही परतीच्या प्रवासा साठी खोपोली मार्गे मार्गस्थ झालो .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा