" किल्ले राजमाची मोहीम "
कर्जतहून कोंदीवडे मार्गेः कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट उभ्या चढाची आहे. किल्यावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.
राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे, एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी Rajmachi Rural Aid and Development Program me या स्वयंसेवी संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे, अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली. राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कँपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे.
पाहण्यासारखी ठिकाणे ..........
लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गेराजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योधचे स्मारक ,अर्धवट तुटलेली तटबंदी,दरवाजाचे अवशेष,गणपति आणि मारुतिरायाची मूर्ती आहे.किल्ल्यावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला 'उधेवाडी' असे म्हणतात. उदयसागर तलाव : पावसाळयात हा तलाव मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते.पावसाळयात दरीतून पडणाऱ्या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते.हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोळणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनोन्मनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात , पलिकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी उत्तुंग तरुंची उभी सभोती श्रेणी एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे.किल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाडांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो. श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला.श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्यापैकी सुस्थितीत आहे.किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते.दरवाजाची कमान बर्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत.किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत .या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे.बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे.समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोटाचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो. शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे.या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यामध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलेले आहे.राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते.या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते.या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला 'भैरण डोंगर' म्हणतात.अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन .बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात.श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखल पट्टी आहे,यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे.येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.
येथे पहा - राजमाची मोहीम फोटो संग्रह !