शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

"किल्ले माहुलीगड" आणि "किल्ले भंडारगड" दुर्गभ्रमण मोहीम !










बरेच दिवस झाले होते कुठेतरी ट्रेकींग ला जाण्याचा प्लान चालू होता .थोडावेळ विचार झाला आणि ठिकाण ठरलं माहुली गड हे नाव आमचा मित्र सागर ने सुचवलं होत तो आधी तिथे गेला होता.  त्याच्यामुळे किल्ला परिसर माहित असलेला एक “मावळा” आमच्या समवेत होता . आम्ही सर्वजण १२ सप्टेंबर २०१५  रोजी शनिवारी मोहिमेसाठी निघणार होतो. पण त्याआधी कोणासाठी तो कामाचा दिवस म्हणून सुट्टी नाही , कोणाचे या ना त्या मार्गाने नाना शंका आणि कुशंका वगळून आम्ही १० जणांची टीम शनिवारी पहाटे च्या ५.४८ च्या आसनगाव लोकल ने निघणार होतो. त्यासाठी घाटकोपर वरून ९ जणांची एक टीम या लोकल ने पुढे रवाना झाली. पण आधीची नाईट शिफ्ट केल्यामुळे माझी ती लोकल मिस्स झाली .त्यामुळे मला ७:३४ मिनिटाच्या दुसऱ्या आसनगाव लोकल शिवाय दुसरा पर्याय नव्हता. आमच्या च काही भरवश्याच्या मित्रांनी ऐनवेळी “टांग” दिल्यामुळे  मला एकट्यालाच या लोकलने आसनगाव पर्यंत चा प्रवास करायचा होता.... असो ! पण आमची जी पहिली टीम जी वेळेनुसार चालत होती , माझ्यामुळे त्यांना हि बराच उशीर पर्यंत वाट पाहत ताटकळत बसावे लागले . जेव्हा आम्ही सर्व १० जण आसनगाव येथील “परिवार हॉटेल” परिसरात दाखल झालो. तेव्हा अधिक उशीर न करता सागर ने आधीच ठरवलेल्या एका टेम्पो चालकाच्या गाडीतून आम्ही आसनगाव (परिवार हॉटेल) ते  किमी अंतरावरील  माहुली ह्या  पायथ्याच्या  गावा पर्यंतचा प्रवास केला . माहुलीगड हा ठाणे जिल्ह्यात असून आसनगाव रेल्वे स्टेशन पासून साधारण ८-१० कि.मी .अंतरावर आहे. या प्रवासावेळी मी मुद्दामून त्या टेम्पो चालकाच्या शेजारी पुढे जाऊन  बसलो , बाकीचे सर्व सवंगडी पाठीमागे बसले होते. त्या प्रवास च्या वेळी मुद्दाम त्या टेम्पो चालका पासून त्या किल्ले परिसरा बाबत अधिक माहिती गोळा करण्याचा उद्धेश होता . त्या  टेम्पो चालका पासून बरीच माहिती मिळाली हि , पण तो खूप खूप मोठ्या  बढाया मारतोय हेच अधिक जाणवले . आणि यावर शिक्कामोर्तम संध्याकाळी तो आम्हा ला पुन्हा परतीच्या प्रवासा च्या वेळी  नेण्यासाठी न येण्या ने झाला .... असो !
गड चढत असताना आमच्यातील तुरळक वगळता गड चढण्याची आत्मिक इच्छा , सामर्थ्य खूप कमी जणांकडे होते , याची जाणीव प्रत्येक जण करून देत होते . बहुदा बहुतेकांची हि पहिलीच वेळ होती , त्यामुळे कदाचित ! पण सर्वांचे आभार मानले पाहिजेत... कारण सर्वांनी जिद्द सोडली नाही . गड चढताना आमची चांगलीच दमछाक झाली होती . आणि धुकं सुद्धा खूप होती.  त्यात डोक्यापेक्षा हि वर वाढलेलं जंगल त्यातून आम्ही चालत होतो .
            भर उन्हात , हिरव्यागार माळ रानात आम्ही गडाचा माथा कधी येतोय याची आतुरतेने वाट पाहत मार्ग चढत होतो . सागर ने “अरे  आलेच फक्त  थोडाच चढायचे ”, “फक्त १५ मिनिट बाकी , मग पोहचलोच ”, “ मग relax  the body करायचे या आणि नाना धीर देणारे गमतीदार  शब्द, आणि डाइलॉग बाजी मुळे सर्वान मधे एक चेतना निर्माण होत  होती . हे ते शब्द सर्वान साठी दर १० मिनिटांनी “एनर्जी ड्रिंक” सारखे काम करायचे. सर्व जण हि एकोप्याच्या भावनेतून पुन्हा गड जोमाने  चढत  होते . त्या बद्दल सर्वांचे आणि त्या एकतेचे अभिनंदन ! आणि त्याच बरोबर खासकरून अभिनंदन करायला हवे  ते राकेश पार्टेचे ! गड चढत असतानापासून जो काही कचरा आमच्याकडून  निर्माण झाला तो सुरवातीपासूनच एकत्र ठेवत हा गडी सर्वाना त्याचे महत्त्व आणि जाणीव करून देत होता . गड उतरून झाल्यावर सुमारे २ किलो वजनाची ती कचऱ्याची पिशवी पायथ्याशी कचरा कुंडीत टाकण्यात आली .

माहुली गड हा फारसा कुणाला माहित नसला तरी शिवाजी महाराजांच्या काळात त्याला महत्त्व होते. आदिलशहा पासून छोट्या निजामाला वाचवण्यासाठी शहाजी राजे शिवबा आणि जिजाऊ ना घेऊन ह्याच किल्ल्यावर आले होते तेव्हा शिवाजी फक्त ६ वर्षांचे होते . पुढे आदिलशहाचा सरदार कार्तलब खान ने २ महिने माहुलीला वेढा दिला होता , नंतर वाटाघाटी ने मार्ग सुटला . माहुलीच्या बाजूलाच पळसगड आणि भंडारगड आहेत . हे खूप विस्तीर्ण असा जंगल आहे .



पुरंदरच्या तहात माहुली पण मुघलांकडे गेला होता पण अवघ्या २ वर्षात महाराजांनी २३ किल्ल्यांसकट २५० किल्ले जिंकले त्यात माहुलीगड ही होता. ठाणे जिल्ह्यातला हा सर्वात उंच किल्ला आहे आणि ह्याची उंची २८०० फूट इतकी आहे
. गडावर आमच्या व्यतिरिक्त काही ट्रेकर आम्हांला दिसले.  माझ्या हातात कॅमेरा होता, त्यामुळे त्यांच्या सारखी काठी घेऊन चढणे शक्य नव्हते.  काही ठिकाणी तर चढण खूप सरळ होती. गड चढत असताना ,बरीच चढण चढल्यावर आम्ही एका टोकावर येऊन पोहचलो बरेच जण पाहिल्यावेळेस आले होते.  तेव्हा इतक्या वर आले नसतीलच. त्यामुळे आता किल्ला कोणत्या बाजूला आहे हे काहीना माहित नव्हत. काही अंतर वर  गेल्यावर ते कळले , तिथून खालचं दिसणारं विहंगमय दृश्य पाहून “खूप भारी” वाटले !  वाटेवरून आम्ही पुढे पुढे चालत होतो , गडावर खूप मस्त वातावरण होतं आणि फोटोग्राफी साठी तर एकदम मस्तच लोकेशन होतं त्यामुळे तिथे फोटो काढण्यात जरा वेळ आम्ही रमलो.
 काही अंतरावर असणाऱ्या वाटेने चालू लागलो पुढे एकदम सरळ उभी दगडं होती आणि त्यावरून चढण्यासाठी एक लोखंडी शिडी होती पण ती वरच्या बाजूला बांधलेली आणि खाल च्या बाजूने हवेत लटकत होती , आम्ही सर्व जण जपून “एक एक” जण त्या शिडीने वर पर्यंत जात होतो . जेव्हा आम्ही माहुली गडाच्या माथ्यावर पोहचलो तेव्हा क्षणभर सर्वांनाच हायसे वाटले .  अजून पुढे आम्ही गेलो तिथे पाण्याचं टाके होते तिथून पुढे गेलो, खूप पुढे गेलो पण किल्ला काही दिसत नव्हता वैतागून एका जागी बसलो. आणि म्हणालो आता काय नाही किल्ला बिल्ला इथेच खाऊया आणि जाऊया घरी ! नकाशात पाहिलं तसं शंकराची पिंडी होती, आणि भग्न अवस्थेतल्या देवड्या आणि तिथेच एक पिण्याच्या पाण्याचं टाके होते. गडावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यातून पिण्याचे पाणी घेऊन आम्ही सर्व जणांनी न्याहारी केली . आणि एका झाडा खालील असलेल्या “श्री शंभू महादेवाच्या पिंडीचे”  दर्शन घेतले.  त्या निसर्गरम्य वातावरणात जेवण्याचा आनंदच वेगळा होता . वातावरण खूप मोहक होते , ढग दाटून आले होते , धुक्यांचे साम्राज्य चारी दिशेला सामाऊन गेले होते , तरी हि   जेवणा नंतर सर्वच थोडे आळसावलेले  होते . मोहीम ठरलेल्या वेळी पुढे जाणे हि तितकेच गरजेचे होते . या भावनेतून सर्वांनी पुन्हा नवीन जोशात माहुलीगड परिसरातील भंडारगड दिशेने मार्गक्रमणा चालू केली . आणि त्याच वेळी ज्याची आम्ही गड चढत असता पासून अधिक  आतुरपणे वाट  पाहत होतो , त्या वरूण राजाने जोरदार हजेरी लावली . आणि सर्वांचा प्रवास दरम्यान चा शीण कुठल्या कुठे पळून गेला . या पुढल्या प्रवास दरम्यान आम्ही “रेप्लीन” चा छोटा सा रोमहर्षक अनुभव हि घेतला . त्या ठिकाणी सागर टेमगिरे या मावळ्याचा असेलेला अनुभव दिसून आला . जोरदार पाउस असल्याने आमच्या पैकी कोणाचे हि कॅमेरे आणि फोन बाहेर निघाले नाही , त्यामुळे त्या वेळचे आणि पुढील अधिक सुंदर वातावरणाचे छायाचित्र काढता आले नाही , हीच एक खंत !
आम्हाला काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते मग आम्ही परतीची वाट धरली येताना मात्र सर्वजण पटापट उतरत होते.सगळ्यांना खूप क्षीण आला होता तेव्हा लवकर खाली जाऊन पाण्यात मजा करायची होती
पाण्यात मजा करून झाल्यावर आम्ही निघालो. एकूण सर्व च प्रवास सर्वाना एक वेगळाच अनुभव देणारा नक्कीच ठरला असणार ! पुन्हा हि नवीन जोमाने , मनात कसलीच शंका , कुशंका न ठेवता , आपुलकीच्या भावनेने  आपल्या थोर पराक्रमी  इतिहासाची जाणीव ठेऊन , एकट्या आणि उध्वस्त अवस्थेतील आपल्याच गड किल्यांवर पुन्हा पुन्हा यावेच !  दुर्गभ्रमंती सर्वानकडून व्हावी हीच शिवरायांन चरणी प्रार्थना !

"किल्ले माहुली दर्शन"- थोडक्यात ओळख!

किल्ले माहुली हा ठाणे जिल्ह्यातील किल्ला असून चढाई साठी मध्यम श्रेणीचा आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.

हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काहीच माहिती नाही पण निजामशाहीत हा किल्ला शहजीराजेंकडे होता पण परकीय आक्रमणासमोर सैन्यबळ कमी असल्याकारणे त्यांना तो मुघलांच्या स्वाधीन करावा लागला नंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात शामिल केला. जवळ जवळ ३ वेळा हा किल्ला परकीयांनी हल्ले करून स्वराज्याकडून जिंकून घेतला आहे पण नंतर तिन्ही वेळा शिवरायांनी माहुली किल्ला पुन्हा जिंकला यावरूनच या किल्ल्याचे महत्व काय असावे याचा अंदाज बांधलेलाच बरा. 


"दिल दोस्ती यारी हे सगळे फेसबुकवरी"
किल्ले दर्शन स्वखर्चाने
, कमीतकमी खर्चात होईल याची नोंद सर्वांनी प्रथम घ्यावी, जेणेकरून अधिक जण या सफरींचा आनंद घेऊ शकतील. – जय शिवराय!!  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा